इतिहास

नाथ संप्रदायाची अतिप्राचीन परंपरा आहे जी आदिनाथापासून सुरु होऊन पुढे श्री मत्सेन्द्रनाथ , श्री गोरक्षनाथ , श्री गहिनीनाथ व श्री निवृत्तीनाथ कडून तेराव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर महाराजापर्यंत चालत आली.

आधुनिक काळात ही परंपरा स्वामी स्वरूपानंद (पावस , रत्नागिरी) यांच्याकडे व त्यानंतर स्वामी माधवनाथ (पुणे ) यांच्याकडे चालत आली . स्वामी माधवनाथानी आपल्या पश्चात स्वामी मकरंद नाथ (पुणे) यांना आपले उत्तराधिकारी नियुक्त केले . या सर्व संतांचे जीवन आणि ध्येय भगवदगीतेवर आधारित आहे.

स्वामी माधवनाथानी १९७५ पासून साधकांना अनुग्रह देण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या युवा साधकांकडे विशेष लक्ष दिले. आपली सर्व कर्तव्य कर्मे करून पारमार्थिक अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. या मार्गावर वाटचाल करून आत्मज्ञानाचे चरम लक्ष त्यांनी गाठावे, तसेच आपल्या वागणुकीतून इतरांपुढे एक आदर्श जीवनाचा वस्तुपाठ ठेवावा असे त्यांचे विचार होते.

स्वामीजींच्या कडे येणाऱ्या युवा साधकांचे एक केंद्र सुरु झाले. त्याचेच पुढे १९८४ साली स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. पुढे स्वामी माधवनाथांकडे येणाऱ्या पुण्याच्या कात्रज, धनकवडी भागातील अध्यात्मप्रेमी साधकांनी एक मंडळ स्थापन केले. स्वामीजींनी मकरंदनाथावर हि जबाबदारीही सोपविली. त्याचे नामकरण ' श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ' असे करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ही पुणे महाराष्ट्र स्थित सार्वजनिक विश्वस्थ संस्था आहे. मंडळाने प्रवचने व ध्यान यासाठी गणेश पुरम (सदाशिव पेठ) व सागर हाइटस (धनकवडी) ही दोन ध्यान मंदिरे सुरु केली.

१९९६ मध्ये स्वामी माधवनाथानी देह ठेवला . तत्पूर्वी १९९२ मध्ये त्यांनी स्वामी मकरंदनाथ यांच्याकडे संप्रदायाचे उत्तराधिकार सोपवले. स्वामी मकरंद नाथांकडे मंडळाची जबाबदारीही सोपविली .